Tuesday 26 September 2023

करवीनिवासिनी अंबाबाई

 

आदिलशाही राज्यात लपविलेली करवीरनिवासिनी अंबाबाईची मूर्ती छत्रपतींनी पुन्हा मूळ मंदिरात स्थापन केली, तो आजचा ऐतिहासिक दिनविशेष....


पातशाह्यांच्या काळात कोल्हापूर प्रांतावर आदिलशहाचा ताबा होता. या काळात सर्वत्र धामधूम माजलेली असायची. राज्यव्यवस्था स्थिर नव्हती. युद्धप्रसंगी मंदिरांची नासधूस केली जायची. अशावेळी देवीच्या मूर्तीस काही अपाय पोहोचू नये या हेतूने करवीरनिवासिनी अंबाबाईच्या पुजाऱ्यांनी देवीची मूळ मूर्ती मंदिरातून काढून नेऊन कपीलतीर्थाजवळ गुप्त ठेवली होती. पुढील काळात कोल्हापूर प्रांत स्वराज्यात आला. छत्रपतींचे स्थिरस्थावर राज्य स्थापन झाले, तेव्हा वेदशास्त्रसंपन्न नरहरभट सावगावकर यांनी करवीर राज्याचे अधिपती श्रीमंत छत्रपती संभाजीराजे (दुसरे) यांची पन्हाळगडावर भेट घेऊन महाराजांस हा सर्व वृत्तांत सांगितला व आपणांस साक्षात्कार होऊन आई अंबाबाईने आपली मूर्ती मूळ ठिकाणी स्थापन करावी, असा दृष्टांत दिल्याचे महाराजांस सांगितले. यावेळी छत्रपती संभाजीराजेंनी आपले सेनापती सिदोजी घोरपडे - हिंदूराव गजेंद्रगडकर यांना अंबाबाईच्या मूर्तीची मूळ मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना करण्याची आज्ञा दिली. महाराजांच्या आज्ञेनुसार सेनापती घोरपडेंनी सन १७१५ साली विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर करवीरनिवासिनीच्या मूर्तीची मूळ मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना केली. ती तारीख होती दिनांक २६ सप्टेंबर १७१५.


तोच हा आजचा ऐतिहासिक दिवस, जेव्हा एक शतकाहून अधिक काळ गुप्तपणे लपवून ठेवलेल्या अंबाबाईच्या मूर्तीची तिच्या मूळ मंदिरात पुनर्स्थापना झाली. छत्रपतींच्या स्थिर व सुरक्षित राजसत्तेचे ते प्रतीक होते. मूर्तीबद्दलची माहिती देऊन आपल्याकडून हे शुभकार्य घडवून घेतल्याबद्दल छत्रपती संभाजीराजांनी नरहरभट यांना काही पेठा व वतने इनाम दिली व देवीच्या नित्य पूजाअर्चेसाठी सावगाव हे गाव इनाम दिले. 


छत्रपती संभाजीराजे (दुसरे) म्हणजे छत्रपती शिवरायांचे नातू व छत्रपती राजाराम महाराजांचे सुपुत्र होत.


संदर्भ : 

करवीर रियासत, पान २६४

सेनापती घोरपडे घराण्याची कैफियत.


छायाचित्र - करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्तीच  ऐतिहासिक छायाचित्र...

Wednesday 20 September 2023

घालीन लोटांगण या प्रार्थनेचे रहस्य

 






*घालीन लोटांगण या प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहित आहे का* ? ...

बाप्पाची आरती झाल्यानंतर एका लयीत व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते. अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे. सर्वत्र म्हणले जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात.

आज आपण या प्रार्थने मधील वैशिष्टे पाहूया व त्याचा अर्थ समजावून घेऊ. ही प्रार्थना चार कडव्याची आहे व पाचवे कडवे हे एक मंत्र आहे.

वैशिष्ट्ये :

(१) प्रार्थनेतील चार कडव्यांचे कवी हे वेगवेगळे आहेत.

(२) ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत.

(३) पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत.

(४) वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे.

आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूया :

१) घालीन लोटांगण वंदीन चरणl डोळ्यांनी पाहिन रूप तुझे | 

प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन | 

भावे ओवाळीन म्हणे नामा |

वरील कडवे संत नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे

अर्थ.. 

कृष्णाला उद्देशुन संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन. माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहिन एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन.

२) त्वमेव माता च पिता त्वमेव | 

त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव | 

त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव | 

त्वमेव सर्व मम देव देव |

हे कडवे आद्यगुरू शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे. ते संस्कृत मध्ये आहे. हे आठव्या शतकात लिहिले गेले आहे.

अर्थ.. 

तूच माझी माता व पिता आहेस. तूच माझा बंधू आणि मित्र आहेस. तूच माझे ज्ञान आणि धन आहेस. तूच माझे सर्वस्व आहेस.

(३) कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा | 

बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात | करोमि यद्येत सकल परस्मै |

नारायणापि समर्पयामि ||

हे कडवे श्रीमदभगवत पुराणातील आहे. ते व्यासांनी लिहिलेले आहे.

अर्थ… 

श्रीकृष्णाला उद्देशून हे नारायणा, माझी काया व माझे बोलणे माझे मन, माझी इंद्रिये, माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे.

(४) अच्युतम केशवम रामनारायणं | 

कृष्ण दामोदरम वासुदेवं हरी | 

श्रीधर माधवं गोपिकावल्लभं | 

जानकी नायक रामचंद्र भजे ||

वरील कडवे आदि शंकराचार्यांच्या अच्युताकष्ठम् मधील आहे. म्हणजेच आठव्या शतकातील आहे.

अर्थ… 

मी भजतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या रामनारायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिकावल्लभाला, त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक श्रीरामचंद्राला.

हरे राम हरे राम | 

राम राम हरे हरे | 

हरे कृष्ण हरे कृष्ण | 

कृष्ण कृष्ण हरे हरे |

हा सोळा अक्षरी मंत्र 'कलीसंतरणं' या उपनिषदातील आहे.

कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे. याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही. हा मंत्र श्री राधाकृष्णाला समर्पित आहे.

अशी ही वेगवेगळ्या कवींची, वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे. तिचे नादमाधुर्य व चाल अलौकिक आहे. 

 हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवा पर्यंत पोचतो.🙏

 *गणेश चतुर्थीच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा*🙏



Thursday 7 September 2023

अकबर बिरबलची आधुनिक गोष्ट

 

*अकबर बिरबल ची गंमतीदार व आधुनिक गोष्ट-* 

*अकबर* – मी तुला ३ प्रश्न विचारेन पण तू मात्र एकच उत्तर द्यायचं.. ते प्रश्न असे...

👉🏻 गेल्या ५० वर्षांत जगभरात डायबेटीस का वाढला ? 

👉🏻 जगभरातल्या चिमण्यांची संख्या का कमी झाली ?

👉🏻 नोवाक जोकोव्हिच जगातला नंबर १ टेनिस प्लेयर का बनला ?  

आता या तिन्ही प्रश्नांचे एकच उत्तर दे.        

*बिरबल* – वाह खाविंद, काय प्रश्न विचारला आपण. या प्रश्नाचं उत्तर आहे *तृणधान्य किंवा मिलेटस्.* बरोबर ? 

*अकबर* – अगदी बरोबर. पण तुला लगेच उत्तर कसं काय सुचतं रे ?
मग या तिन्ही प्रश्नांचे उत्तर तृणधान्य कसे ते तूच समजावून सांग आता..

*बिरबल* – काही हरकत नाही हुजूर. आता डायबेटीस का वाढला ? तर गेल्या ५०-६० वर्षांत लोकांचे भात आणि गहू खाण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. ज्वारी, बाजरीसारखी तृणधान्य खायचे लोकांनी बंद केले. त्यात पुन्हा हे गहू तांदूळ आता संकरित बियाण्यांपासून पिकवतात आणि पॉलिश तर इतके करतात कि आजिबात फायबर शिल्लक ठेवत नाहीत. असं धान्य खाल्लं की त्यातली साखर लगेच रक्तात उतरते आणि मग डायबेटीस होतो. 

*अकबर* – बरं मग त्या चिमण्या कुठे उडून गेल्या ?

*बिरबल* – त्याचं असं आहे खाविंद. बाजरी, नाचणी, राळे यासारखी छोटी तृणधान्य हे चिमण्यांचे आवडते खाद्य आहे. पण आता शेतात सगळीकडे गहू आणि तांदूळ पिकतो. शेतात तृणधान्यच नाही तर बिचाऱ्या चिमण्या खाणार तरी काय ?

*अकबर* – आणि त्या तिसऱ्या प्रश्नाचं काय ? आणि हा जोकोव्हिच कोण ?    

*बिरबल*– धीर धरा खाविंद सांगतो. नोव्हाक जोकोविच हा सर्बियाचा टेनिस प्लेयर आहे. आज तो जगात नंबर १ आहे. पण त्याच्या करीयरची सुरवात एवढी चांगली नव्हती कारण त्याचा स्टॅमिना कमी होता. तो पटकन थकायचा कधीकधी तर विनिंग पोझिशनमधून त्याने मॅचेस सोडून दिल्या आहेत. मग एके दिवशी त्याला एक डाएटिशीयन भेटला. त्याने जोकोविचला गव्हातल्या ग्लुटेनची अॅलर्जी असल्याचे सांगून आहारातून गहू पूर्णपणे बंद करण्याचा सल्ला दिला. मग त्याने मिलेट खायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य ? जोकोविचचा थकवा जणू गायब झाला. आज त्याच्या नावावर जगातल्या सर्वाधिक २३ ग्रॅण्डस्लॅम टायटल आहेत आणि तो जगातील नंबर १ प्लेयर आहे. 

*मित्रांनो गोष्ट जरी काल्पनिक असली तरी त्यात विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरं वास्तव स्थितीवर आधारित आहेत. संयुक्त राष्ट्रसंघ अर्थात United Nations ने २०२३ हे वर्ष ‘जागतिक भरडधान्य वर्ष’ म्हणजेच International year of Millets म्हणून घोषित केले आहे. यामागे तृणधान्यांचे महत्त्व जगभर पोहोचावे हा उद्देश आहे*...
😊🌸🙏

Tuesday 5 September 2023

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्राबाबत

 *राज्यातील सर्व शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा*


*वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण महत्त्वाचे*


ज्या प्रशिक्षणार्थी यांनी वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण १००% पूर्ण केले आहे त्यांनी https://training.scertmaha.ac.in/Certificate2023/

या लिंक वर जाऊन आपले प्रशिक्षण पूर्ण करून घ्यावे.


1. प्रस्तुत प्रमाणपत्र एकदाच बदल करता येणार आहे. म्हणून सर्व माहिती व्यवस्थित वाचून भरा.


२.प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यापूर्वी आपले पूर्ण नाव, शाळेचे नाव, पत्ता व्यवस्थित भरल्याची खात्री करा.


३. आपल्यास हवा असलेला प्रशिक्षण गट व प्रकार योग्य असल्याची करा. *प्रशिक्षण प्रकार व गट चुकला असल्यास प्रमाणपत्र डाऊनलोड करू नका. 


४. या कार्यालयाशी संपर्क साधून योग्य बदल करून घ्या.


५. एकदा चुकलेले प्रमाणपत्र पुन्हा दुरुस्ती करून मिळणार नाही, याची नोंद घ्यावी.


६. प्रशिक्षण १००% पूर्ण करूनही डाऊनलोड साठी प्रमाणपत्र  उपलब्ध न होणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांनी गोंधळून जावू नये. त्यांना 2 आठवड्यात प्रमाणपत्र प्राप्त होईल.


अमोल येडगे, भा. प्र. से.

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे.

करवीनिवासिनी अंबाबाई

  आदिलशाही राज्यात लपविलेली करवीरनिवासिनी अंबाबाईची मूर्ती छत्रपतींनी पुन्हा मूळ मंदिरात स्थापन केली, तो आजचा ऐतिहासिक दिनविशेष.... पातशाह्य...